नवी दिल्ली, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – सर्वाधिक उत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा काल करण्यात आलीय. 19 एप्रिलपासून 1 जूनपर्यंत देशात लोकसभा निवडणुकांचं मतदान होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांचं हे वेळापत्रक जाहीर केलं. राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे. मुंबई आणि एमएमआरमध्ये 20 मे या दिवशी म्हणजेच अखेरच्या टप्प्यात मतदान होईल.
सी व्हिजील ॲपद्वारे गैरप्रकार टाळणार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना काही आव्हानांचा उल्लेख केला. निवडणुका हिंसाचारमुक्त व्हाव्या, पैशांचा गैरवापर टाळला जावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही नियमावलीही तयार केली आहे. गुन्हेगारी, पैशांचा अनैतिक वापर, अफवा, चुकीच्या माहितीचा प्रसार, आणि आदर्श आचारसंहिता भंग ही चार आव्हानं निवडणूक आयोगासमोर आहेत असं त्यांनी म्हटलंय. निवडणूक प्रचारातले गैरप्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी सी व्हिजील (cVIGIL App) ॲपची माहिती दिली आहे. गैरप्रकार होत असेल तर फोटो काढून ॲपवर अपलोड करा, कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल
मुख्य निवडणूक आयुक्तांची तंबी
भाषेच्या मर्यादा पाळा.
टीका करताना लक्ष्मणरेषा ओलांडू नका.
अफवा, फेक न्यूज खपवून घेणार नाही.
धार्मिक द्वेषपूर्ण विधानं करु नयेत.
प्रचाराता लहान मुलांचा वापर नको.
सोशल मीडियावरील वादग्रस्त, चुकीच्या माहितीवर करडी नजर
निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली तयार केली आहे.तसेच खास सी व्हिजील ॲपही तयार करण्यात आलं आहे.
काय आहे सी व्हिजील ॲप?
उमेदवार पैसे, वस्तू वाटप करत असेल तर तक्रार करा.
निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर तक्रार करा.
पैसे वाटप किंवा वेळेनंतर प्रचार केल्यास त्याचा फोटो काढा आणि ॲपवर अपलोड करा.
तुमच्या मोबाईल लोकेशनचा वापर करुन तुमचा ठावठिकाणा शोधला जाईल.
तक्रार केल्यानंतर 100 मिनिटांत निवडणूक आयोगाचं पथक घटनास्थळी पोहोचेल.
तुमच्या तक्रारींचं निवारण करण्यात येईल.