पुणे, (हॅलो महाराष्ट्र न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. 21) दुपारी एक वाजता ऑनलाईन माध्यमातून जाहीर होणार आहे. याबाबत मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.
बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आली. त्यानंतर निकालाबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. मंडळाने निकालाची तारीख जाहीर केली असून मंगळवारी ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार (दि. 22 मे) ते बुधवार (दि. 5 जून) या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील. उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी अर्ज करायचा असेल तर अगोदर उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसात उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये लगेच घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार (दि. 27 मे) पासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल –
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
www.tv9marathi.com
http://results.targetpublications.org